Mahindra Group : महिंद्रा समूहाने महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून, पुढील दहा वर्षांत राज्यात १५,००० कोटी रुपये गुंतवण्याचा मानस व्यक्त केला आहे. या गुंतवणुकीचा सर्वात मोठा भाग नागपूरमध्ये खर्च केला जाणार असून, येथे महिंद्राचा देशातील सर्वात मोठा 'एकात्मिक उत्पादन प्रकल्प' उभारला जाणार आहे.
नागपूर ठरणार महिंद्राचे 'मॅन्युफॅक्चरिंग हब'
'ॲडव्हान्टेज विदर्भ' या कार्यक्रमात महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या विस्ताराची योजना जाहीर केली. नागपूर येथील प्रस्तावित प्रकल्प हा वाहन आणि ट्रॅक्टर निर्मितीसाठी समूहाचा सर्वात मोठा कारखाना असेल. या प्रकल्पातून वार्षिक ५ लाख वाहने आणि १ लाख ट्रॅक्टर तयार केले जातील. या प्रकल्पात २०२८ पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणे अपेक्षित आहे. एकाच छताखाली वाहन आणि ट्रॅक्टर निर्मितीची ही महिंद्राची सर्वात मोठी यंत्रणा असेल.
नाशिक-इगतपुरी पट्ट्याचाही होणार विस्तार
केवळ नागपूरच नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि इगतपुरी परिसरातही महिंद्रा आपल्या इंजिन क्षमतेचा विस्तार करणार आहे. उत्पादनासोबतच 'प्रगत तंत्रज्ञान' विकासासाठी महिंद्रा तीन वेगवेगळ्या ठिकाणी २,००० एकरपेक्षा जास्त जमीन संपादित करणार आहे. हा विस्तार 'मेक इन इंडिया फॉर द वर्ल्ड' या मोहिमेला बळ देण्यासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानावर आधारित असेल.
'मेक इन इंडिया'ला जागतिक ओळख मिळवून देणार - राजेश जेजुरीकर
महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक आणि सीईओ राजेश जेजुरीकर यांनी या गुंतवणुकीचे महत्त्व विषद केले. "हा प्रकल्प महिंद्राच्या उत्पादन प्रवासातील एक धाडसी पाऊल आहे. पुढील पिढीची वाहने आणि ट्रॅक्टर तयार करण्यासाठी हा प्रकल्प सज्ज असेल. यामुळे आमची उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच जागतिक बाजारपेठेत भारतीय बनावटीची उत्पादने पोहोचवण्यास मदत होईल," असे त्यांनी नमूद केले.
वाचा - महागाई भत्त्यात २ टक्क्यांची भरघोस वाढ? केंद्र सरकारच्या निर्णयाकडे ५० लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष
विदर्भासाठी रोजगाराची मोठी संधी
महिंद्राची ही गुंतवणूक विदर्भाला भारताच्या औद्योगिक नकाशावर प्रबळ स्थानावर नेऊन ठेवणारी आहे. १५,००० कोटींच्या या गुंतवणुकीमुळे नागपूर आणि आसपासच्या परिसरात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
